Ad will apear here
Next
दुसरे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले (सातारा)
छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले (१८ जानेवारी १७९३ - १४ ऑक्टोबर १८४७)

साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांचा १४ ऑक्टोबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
......
धाकटे छत्रपती शाहूमहाराज यांच्या निधनानंतर त्यांचे थोरले पुत्र प्रतापसिंह सातारच्या गादीवर आले. छत्रपती प्रतापसिंह व त्यांच्या मातोश्रींना बाजीराव पेशवे यांची कैद असह्य होऊन त्यांनी पुण्यातील इंग्रज अधिकारी एल्फिन्स्टन यांच्याकडे मदतीसाठी गुप्तपणे बोलणे चालवले होते. याची कुणकुण बाजीराव पेशव्यांना लागताच त्यांनी छत्रपती प्रतापसिंह यांना इंग्रजांपासून दूर ठेवण्यासाठी कुटुंबासह वासोटा किल्ल्यावर नेऊन ठेवले. तिथून पुन्हा प्रतापसिंह यांना बाजीराव पेशव्यांनी पुण्यात आपल्या लष्करात आपल्याजवळ ठेवले. 

इंग्रजांनी सर्व मराठी राज्य आपल्या ताब्यात घेऊन छत्रपतींकडे अगदी कमी मुलूख ठेवला. १८१९मध्ये इंग्रजांनी त्यांना पाहिजे तसा करार छत्रपती प्रतापसिंहांकडून करून घेतला. सर्व मराठेशाहीच्या हिंदुस्तानभर पसरलेल्या मुलखांपैकी छत्रपती प्रतापसिंह यांना नीरा व वारणा या नद्यांमधील प्रदेश देण्यात आला. कराड, फलटण, जत, वाई आणि अक्कलकोटचे जहागीरदार हे फक्त छत्रपतींच्या आधिपत्याखाली राहिले. बाकी सर्व कारभार इंग्रजांकडे जाऊन सातारा येथे नेमलेल्या ब्रिटिश रेसिडेंटच्या परवानगीशिवाय कुठलेही काम न करण्याचे बंधन प्रतापसिंहांवर आले. 

प्राप्त परिस्थितीत सातारा व परिसराची जमेल तेवढी सुव्यवस्था करण्याचे ठरवून छत्रपती प्रतापसिंहांनी यवतेश्वर येथे तलाव बांधून त्याचे पाणी सातारा शहरात आणले. शहरात सरळ व रुंद रस्ते तयार केले. नवा राजवाडा व जलमंदिर बांधले. मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा बांधून एक छापखानाही काढला. छत्रपती प्रतापसिंहांना आपले मराठा राज्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याची इच्छा होती. परंतु त्यांच्याविरुद्ध सारखीच कटकारस्थाने चालू होती. ब्रिटिशांचा हस्तक बाळाजीपंत नातू याने बाजीरावांचा बीमोड करून मराठा राज्य इंग्रजांच्या घशात घालण्यासाठी केवळ स्वार्थापोटी अनेक कारस्थाने करून इंग्रजांना मदत केली होती. 

सद्‌गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे. हे छत्रपती म्हणजे दुसरे शाहू व आनंदीबाई यांचे थोरले पुत्र. छत्रपती शाहूंनंतर साताऱ्याच्या गादीवर आले. सवाई माधवराव पेशवेपदावर असताना नाना फडणवीस मुख्य कारभारी होते. छत्रपती पहिले शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या दोन याद्यांप्रमाणे मराठी राज्याचे पुढारीपण पेशव्यांकडे आले होते. सवाई माधवरावांनी छत्रपतिपदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली. परंतु दुसरे बाजीराव पेशवेपदी आल्यावर त्यांनी हळूहळू छत्रपतिपदाचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना त्याने प्रथम सातारच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले (१८०९). 

ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले याने मोडले; पण त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने प्रतापसिंहांची नजरकैद अधिकच कडक केली. त्या वेळचा इंग्लिश रेसिडेंट माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन याने या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले. हे करताना त्याने घोषित केले, की ‘मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मला पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे असून, छत्रपतींची सत्ता राखावयाची आहे.’ 

परिणामतः आष्टी (सोलापूर जिल्हा) येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज-मराठे लढाईत (१८१८) प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते. पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रतापसिंह यांना छत्रपतींच्या गादीवर पुन्हा नेऊन बसविले. 

एल्फिन्स्टनने प्रतापसिंहांशी तह करून त्यांच्या अनेक वाजवी हक्कांत काटछाट केली; तरी साताऱ्यात नेमलेल्या ग्रँट डफसारख्या रेसिडेंटने साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंहांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत केले. राज्यकारभारात उत्तजेन दिले व राज्यात शिस्त आणली. प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या. शहरात नवा राजवाडा, जलमंदिर यांसारख्या काही वास्तू बांधल्या. शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा काढली आणि तीमधून संस्कृत-मराठीबरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले. छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती. 

या लोकहितवादी राजाच्या कार्यक्षम प्रशासनाविषयी ग्रँट डफने गव्हर्नरकडे शिफारस केली. तेव्हा त्यांच्या काही अधिकारांत इस्ट इंडिया कंपनीने पाच एप्रिल १८२२च्या जाहीरनाम्याने वाढ केली. ग्रँट डफ हा रेसिडेंट म्हणून प्रतापसिंहांच्या दरबारी १८१८ ते १८२२दरम्यान होता; त्याने या काळात मराठ्यांच्या इतिहासाची साधनसामग्री जमा करून पुढे ‘हिस्ट्री ऑफ द मराठाज’ हा ग्रंथ लिहिला (१८२६). एल्फिन्स्टनची कारकीर्द संपल्यावर इंग्रजांचे प्रतापसिंहांविषयीचे एकूण धोरण बदलले. मुंबईचा गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट याने कर्नल ओव्हान्स या रेसिडेंटच्या सांगण्यावरून प्रतापसिंहांचे राज्य बुडविण्यासाठी हीन वृत्तिनिदर्शक अनेक कटकारस्थाने रचली. 

छत्रपती प्रतापसिंह यांचे धाकटे बंधू शहाजी उर्फ आप्पासाहेब यांना आपल्या कारस्थानात इंग्रजांनी सामील करून घेतले. १८३९ साली हा कट कार्यरत झाला. बाळाजीपंत नातू यांना सातारा राज्याचे दिवाणपद हवे होते. इंग्रजांनी ठरल्याप्रमाणे छत्रपती प्रतापसिंहांवर अनेक खोटे आरोप लावून त्यांना दोषी जाहीर करून अन्यायाने पदच्युत केले व रात्रीच्या वेळेस बिछान्यावर झोपलेले असताना त्याच कपड्यांत त्यांना कैद करून लिंब गावी दोन महिने अत्यंत वाईट परिस्थितीत ठेवून त्यांची रवानगी काशी येथे करण्यात आली. 

पाच सप्टेंबर १८३९ रोजी अप्पासाहेबांना गादीवर बसवून इंग्रजांनी त्यांच्याशी नवा तह केला. या तहाने पूर्वी छत्रपतींच्या अधिकाराखाली असलेल्या सहाही जहागिरी इंग्रजांनी यांच्याकडून काढून आपल्या ताब्यात घेतल्या. छत्रपती अप्पासाहेब हे केवळ सातारा भागापुरते मर्यादित राहून ब्रिटिशांच्या हातचे बाहुले बनले. १८४०पासून छत्रपती प्रतापसिंहांनी आपल्याविरुद्धच्या अन्यायाची दाद मागण्यासाठी कैदेतून प्रयत्न चालू केले. रंगो बापूजी गुप्ते यांनी छत्रपती प्रतापसिंहांची बाजू मांडण्यासाठी लंडनपर्यंत धाव घेतली. परंतु पदरी निराशाच आली. बाळाजीपंत नातूची कारस्थाने या खटपटीतूनत उघड झाली. अत्यंत खालच्या पातळीला जाऊन प्रथम पेशवाई व नंतर सातारा राज्य केवळ स्वार्थासाठी बुडविण्यास कारणीभूत झालेल्या बाळाजीपंत नातूची जनमानसात छी थू होऊन त्याला अखेर तोंड लपून काशीला जायची पाळी आली. तिकडेच तो मरण पावला. 

थोर छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांचा १४ ऑक्टोबर १८४७ रोजी मृत्यू झाला. छत्रपती शहाजी उर्फ अप्पासाहेब पाच एप्रिल १८४८ रोजी दत्तक घेऊन निधन पावले. त्यांच्या निधनानंतर दत्तक नामंजूर करून इंग्रजांनी सातारा राज्य खालसा करून अखेरची निशाणी मिटवून टाकली. 

छत्रपती प्रतापसिंहांना अभिवादन!

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर, पुणे
(इतिहास अभ्यासक)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UWOGCR
Similar Posts
रायाजीराव जाधवराव निजामाच्या सैन्याविरुद्ध लढताना रायाजीराव २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेड येथे लढाईत धारातीर्थी पडले.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी जन्माला आलेले संभाजीराजे हे कोल्हापूर राज्याचे दुसरे छत्रपती. २० डिसेंबर हा त्यांच्या स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयी...
स्त्री-शिक्षणासाठी झटलेल्या श्रीमंत इंदुमती राणीसाहेब राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांनी स्त्री-शिक्षणविषयक, तसेच अन्य सामाजिक कार्यातून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज १८ मे १६८२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना पुत्ररत्न झाले. हेच पुढे थोरले शाहू म्हणून इतिहासात अजरामर झाले. १५ डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language